आम्हाला उपदेशाची गरज नाही   

जयशंकर यांनी युरोपीय महासंघाला फटकारले

नवी दिल्ली : भारताला मित्रांची गरज असून उपदेशाचे डोस पाजणार्‍यांची नाही, अशा शब्दांत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यानी युरोपीय महासंघाला रविवारी फटकारले आहे. 
 
आर्कटिक्ट सर्कल इंडिया फोरमच्या वतीने आयोजित कार्यक्रमात जयशंकर बोलत होते. ते म्हणाले, भारतासोबत दृढ परस्पर संबंध हवे असतील तर त्याचे प्रदर्शन युरोपीय महासंघाने जरूर करावे. पण, भारताला चांगल्या मित्रांची गरज असून केवळ उपदेशाचे डोस पाजणार्‍यांची नाही.  भारत आणि रशिया यांचे मित्रत्वाचे संबंध हे एक चपखल बसणारे उदाहरण आहे. ग्राहक आणि पुरवठदार याचा तळमेळ घालून दोन्ही देश वाटचाल करत आले आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धाचा तोडगा काढताना पाश्चिमात्य देश रशियाला वगळून तो काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, ही बाब वस्तुस्थितीला धरुन नाही.
 
मी जेव्हा रशिया किंवा अमेरिका यांच्याबाबत बोलतो तेव्हा वस्तुस्थिती मांडतो. अमेरिकेसोबत भागीदारी करताना  तात्विक भेदाचे विषय बाजूला ठेवून दोन्ही देशांच्या गरजा काय  आहेत? याचा विचार साकल्याने केला पाहिजे. त्याद्वारेच एकत्रित काम करता येणार आहे.
 
आर्कटिक्ट परिसराची परिस्थिती वेगाने बदलत चालली असल्याबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. युरोपकडून भारताच्या अपेक्षा काय आहेत ? या प्रश्नावर जयशंकर म्हणाले, केवळ उपदेश नकोत तर, एकत्रित काम करण्याच्या चौकटीचा विचार अधिक हवा आहे.  भारत जगाकडे पाहतो तेव्हा तो मित्रच शोधत असतो. केवळ उपदेश देणारे आमच्या काही कामाचे नाहीत. युरोपीय महासंघातील देश अजूनही तसे करत आहेत. त्यांनी वस्तुस्थिती नेमकी काय आहे ? हे प्रथम पडताळून पाहिले पाहिजे. भागीदारी करायची असेल तर ती काही विचारांवर अवलंबून असावी. त्यत संवेदनशीलता हवी आणि समान हित काय आहे आणि जागतिक वस्तुस्थिती काय आहे, याचा विचार केला तर अधिक बरे ठरेल, असेही ते म्हणाले.

Related Articles